यशवाडी (गावकरी टाइम्स विशेष प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील यशवाडी देवस्थान येथून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक बातमी समोर येत आहे. येथील एका प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या सभा मंडपाच्या पिलरसह छताचा मोठा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. या भीषण अपघातात आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ५ ते ६ भाविकांचे शव बाहेर काढण्यात आले असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
महाप्रसाद आणि कीर्तनामुळे मंदिरात होती मोठी गर्दी
आज शनिवार हा हनुमान भक्तांसाठी विशेष दिवस असल्याने यशवाडी येथील हनुमान मंदिरात कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. लोक महाप्रसाद घेत असतानाच हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
बांधकाम सुरू असतानाच कोसळले छत
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हनुमान मंदिराच्या अगदी समोर सभा मंडप उभारणीचे काम (लोखंडी रॉड आणि दगडी बांधकाम) सुरू होते. बांधकाम प्रक्रियेत असतानाच अचानक पिलर आणि छताचा हिस्सा भरभरून खाली आला. छत कोसळताच मंदिर परिसरात एकच चीत्कार आणि पळापळ सुरू झाली. ढिगाऱ्याखाली ३० ते ४० भाविक दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन (बचावकार्य) सुरू करण्यात आले आहे.

0 Comments