नेमका प्रकार काय?
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजेपासूनच अनेक शेतकरी आपली आजारी जनावरे घेऊन दवाखान्यात हजर झाले होते. मात्र, १० वाजेपर्यंत डॉक्टरांचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. काही शेतकरी नाईलाजाने आपली जनावरे परत घेऊन गेले, तर रवींद्र मोरे, समाधान नानापुरे, मुक्तार शहा, सायराबी पठाण यांसारखे अनेक शेतकरी उन्हात उपाशीपोटी डॉक्टरांची वाट पाहत बसले होते.
प्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर डॉक्टर अवतरले!
शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत प्रतिनिधी सुरेश मोरे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन डॉ. नेवरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा कुठे एक तासानंतर डॉक्टर साहेब दवाखान्यात हजर झाले आणि जनावरांवर उपचार सुरू केले.
दवाखान्याची दुरवस्था आणि स्वच्छतेचा अभाव:
केवळ गैरहजेरीच नव्हे, तर दवाखान्याच्या परिसराचीही मोठी दुर्दशा झाली आहे. दवाखान्यात कुठेही कामाची वेळ दर्शवणारा फलक किंवा सूचना फलक लावलेला नाही. परिसरात सर्वत्र कचरा आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. "लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण" या उक्तीप्रमाणे डॉक्टर लोकांना स्वच्छतेचे धडे देतात, मात्र स्वतःच्या दवाखान्यात स्वच्छतेचा पत्ता नाही, अशी खोचक टीका नागरिक करत आहेत.
याबाबत डॉ. नेवरे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. आता याप्रकरणी वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष देऊन डॉ. नेवरे यांच्यावर कठोर कारवाई करणार का? दवाखान्याचा परिसर स्वच्छ होऊन शेतकऱ्यांची सोय होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments