षडयंत्र रचून चळवळीच्या कार्यकर्त्यांना संपवू नका; मेहकरमध्ये संदीपभाऊ गवई यांचा कडाडून हल्लाबोल.



मेहकर(गावकरी टाइम्स): 
"आज संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारचे दूषित राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. अशा काळात नव्या दमाच्या तरुणांना संधी देऊन त्यांना बळ देण्याची गरज आहे. मात्र, केवळ राजकारण करून आणि षडयंत्र रचून चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे प्रयत्न करू नका," असा कडाडून हल्लाबोल तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीचे युवा नेते संदिपभाऊ गवई यांनी केला. 
मेहकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयामध्ये आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

 संयुक्त जयंती व वर्धापन दिनाचे औचित्य तथागत 

बहुउद्देशीय संस्था, जीवन दीप अनाथ आश्रम व वृद्धाश्रम, राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट आणि तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचा सातवा वर्धापन दिन, तसेच महात्मा जोतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांची उपस्थिती 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई दिलीप खरात होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संदिपभाऊ गवई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वाघ साहेब, स्नेहल वानखडे, आसमा आत्राम, रफिकभाई कुरेशी, फिरोजभाई शहा, अख्तर कुरेशी, संदीप राऊत, प्रवीण सरदार यांची उपस्थिती होती. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

 गुणावंतांचा यथोचित सन्मान

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील स्त्री-पुरुषांना यावेळी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या पुरस्कारांविषयी बोलताना कार्यकर्ते म्हणाले की, "तथागत ग्रुपकडून मिळणारा हा सन्मान आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरत आहे." "तरुणांना पुढारपण देऊन त्यांना ताकद दिली पाहिजे. त्यांना राजकारणाचा बळी ठरवणे समाजासाठी घातक आहे." — भाई दिलीप खरात (अध्यक्षीय भाषणातून) 

 नियोजनाची यशस्वी धुरा

या सोहळ्याचे नेटके नियोजन संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कुणाल माने व संदीप राऊत यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वाघ साहेब यांनी मांडले. संचालन रफिकभाई कुरेशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मार्गदर्शक फिरोजभाई शहा यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७ ——— बातमी आणि जाहिरात साठी संपर्क करा : ९८६०४९४८०७

Post a Comment

0 Comments