बुलढाणा(गावकरी टाइम्स):
बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला खामगाव-जालना रेल्वे मार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर आता जिल्ह्याला लवकरच 'गोड बातमी' मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
या रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या एकूण निधीपैकी ५० टक्के वाटा उचलण्याची तयारी राज्य सरकारने यापूर्वीच दर्शवली असून, अर्थसंकल्पात तशी तरतूदही करण्यात आली आहे. उर्वरित निधी आणि अंतिम तांत्रिक मंजुरीसाठीचा प्रस्ताव आता रेल्वे मंत्रालयाकडून वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे या मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यातील सर्व अडथळे आता दूर होताना दिसत आहेत.
विकासाची नवी पहाट
खामगाव-जालना या रेल्वे प्रकल्पामुळे मध्य आणि दक्षिण रेल्वेचे जाळे थेट जोडले जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला होईल. २००९ पासून खासदार प्रतापराव जाधव यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने संसदेत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या कष्टाला आता यश येताना दिसत असून, लवकरच या मार्गावर रेल्वे धावताना पाहण्याचे बुलढाणेकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

0 Comments